सोनवडी ता. दौंड येथील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत रामू रेखू राठोड (वय ४२, रा. सेवालाल नगर, ता. दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. किरण रामू राठोड (वय १७) हा नानासाहेब तात्याबा माध्यमिक आश्रम शाळेमध्ये इयत्ता ११ वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी गेला होता. परंतु, त्याला प्रवेश न मिळाल्याने किरण निराश होऊन घरी परतला. त्याने घराचे दार लावून स्वत:ला कोंडून घेतले व नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुख्याध्यापकाला अटक
सोनवडी येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्ये प्रकरणी मुख्याध्यापक विलास काकडे (वय ४९, रा. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. किरण रामू राठोड या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याचे वडिल रामू राठोड यांनी फिर्याद दिली होती. अपंगत्व आणि जातीवर टीका केल्याचा अपमान किरणला सहन झाला नाही आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली अशी तक्रार किरणच्या वडिलांनी दिली आहे. नानासाहेब तात्याबा पवार माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास काकडे हेच आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट