पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रजच्या नवीन बोगद्यापासून किवळे फाट्यापर्यंतच्या ३४ किलोमीटर रस्त्यावर गेल्या साडेचार वर्षांतील अपघातांत १५७ जणांचा बळी जाऊनही उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. या रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणांची यादी वाहतूक पोलिस शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) यापूर्वीच पाठविली असली, तरी त्यानंतर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.
नऱ्हे येथे गुरुवारी झालेल्या भीषण अपघातानंतर कात्रज- देहूरोड बायपासवरील अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या रस्त्याकडे झालेल्या कमालीच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका कायम असल्याचे याबाबतच्या पाहणीतून अधोरेखित झाले आहे. या रस्त्यावर एकूण वीस अपघातप्रवण क्षेत्र असून, त्यांची यादी वाहतूक पोलिसांनी तयार केली आहे. विश्वास पांढरे हे वाहतूक शाखेचे उपायुक्त असताना ही यादी केली गेली; तसेच त्यांबाबतच्या काही उपायोजना द्विसदस्यीय समितीने सुचविल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव 'एनएएचआय'कडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर कोणतेही उत्तर आलेले नसल्याचे पोलिसांनी 'मटा'ला सांगितले.
कात्रज नवीन बोगद्यापासून मुंबईच्या दिशेला असलेल्या किवळे फाट्यापर्यंत ३४ किलोमीटर अंतर आहे. प्रामुख्याने खेड शिवापूरहून पुण्याच्या दिशेला येताना कात्रज नवीन बोगद्यातून बाहेर आल्यानंतर वडगाव बुद्रुकपर्यंत तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे या ठिकाणी अपघात होतात, असा अनुभव आहे.
गर्दीच्या नियमनासाठी पोलिस
गुरुवारच्या अपघातानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी नऱ्हे येथील अपघातप्रवण परिसरामध्ये वाहतूक पोलिस नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 'सकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढलेली असते; तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे,' अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
अपघात प्रवण क्षेत्रे
कात्रज बोगदा बाह्यवळण, दरी पूल, आंबेगाव (बु.), नऱ्हेगाव, वडगाव पूल, मुठानदी पूल, वारजे पूल, डुक्कर खिंड, चांदणी चौक, बांदल इस्टेट, एचईएमआरएल, सूस रस्ता ते सुतारवाडी, किलोस्कर कंपनीसमोर, बालेवाडी, मुळा नदीलगत, वाकड पूल, इंदिरा कॉलेजसमोर, साई पेट्रोल पंपासमोर, हॉटेल गोकुळ आणि राजमुद्रासमोर.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट