अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश देतानाच, दुसऱ्या बाजूने त्यात हस्तक्षेप करणाऱ्या 'माननीयां'नीच नियम धुडकावून अतिक्रमण केल्याचे उजेडात आले आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीच केलेल्या या अतिक्रमणावर कारवाई होणार का, अशी विचारणा आता केली जात आहे.
पालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाईची तीव्र मोहीम सुरू केली आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींनीच आता या कारवाईला विरोध सुरू केला असून, अनधिकृत व्यावसायिकांवरच कारवाई करा, असा आग्रह धरला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून कारवाईत हस्तक्षेप सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला काही समित्यांच्या सदस्यांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे.
धनकवडी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच, पुण्याईनगरमध्ये वही विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. स्टॉलवर शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांचे नाव आणि फोटो आहे. वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने हा स्टॉल उभारण्यात आला असूनही त्यावरील कारवाईबाबत मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने स्टॉल उभारला असल्यास तो काढून टाकण्यात येईल, असे अशोक हरणावळ यांनी सांगितले.
याच पद्धतीचे स्टॉल अप्पा बळवंत चौकापासून बुधवार चौकापर्यंत जागोजागी लागले आहेत. सर्वच पक्षांच्या अधिकृत बॅनरखाली हे स्टॉल लावण्यात आले असून, गरजू विद्यार्थ्यांना स्वस्तात वह्या उपलब्ध व्हाव्या, यासाठी स्टॉल लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शालेय साहित्य खरेदीसाठी आधीच गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या परिसरात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या स्टॉलमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे, या स्टॉलवरही कारवाई केली जावी, अशी मागणी फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांकडून होत आहे.
पुनर्वसन आणि फेरीवाला शुल्कावर सादरीकरण
अतिक्रमण कारवाईवरून राजकारण तापले असतानाच, शहरातील सर्व पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकडून शुल्क आकारणीबाबतच्या प्रस्तावावर शुक्रवारी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. सहा महिन्यांहून अधिक काळ शुल्क आकारणीवर निर्णय होत नसल्याने पालिकेला त्याद्वारे मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे. या सादरीकरणादरम्यान सर्व पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली असून, त्यासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्टीकरण अतिक्रमण विभागाने दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट