पुणे शहर आणि आसपासच्या परिसराची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणातील पाणी दूषित (क्षारयुक्त) होऊ लागले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च सेंटरने (सीडब्ल्यूपीआरएस) काढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेली बांधकामे आणि वाढलेली लोकवस्ती यामुळे पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण वाढले असून, आगामी काळात धरणक्षेत्रातील बांधकामे न थांबल्यास संपूर्ण धरणाचा पाणीसाठा दू्षित होण्याचा धोका असल्याचे 'सीडब्ल्यूपीआरएस'ने सूचित केले आहे.
खडकवासला धरणातील पाण्याविषयी 'सीडब्ल्यूपीआरएस'ने अभ्यास केला आहे. धरणाच्या काठापासून ते मध्यवर्ती भागातील सहा ठिकाणचे पाण्याचे आणि जैविक नमुने घेऊन त्यावर 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. ते निष्कर्ष 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या वार्षिक अहवालात मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये धरणाच्या काठावरील पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झाले असल्याचे आढळून आल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
या धरणातील पाण्यामध्ये क्षार वाढण्याची कारणेही 'सीडब्ल्यूपीआरएस'कडून सांगण्यात आली आहेत. प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रात होणारी बांधकामे आणि वाढती लोकवस्ती यामुळे हे पाणी दूषित होऊ लागले आहे.
बांधकामांसाठी वापरण्यात येणारे सिमेंट हे नाले आणि जमिनीत झिरपून धरणामध्ये येत असल्याने धरणाच्या कडेला असलेल्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. आगामी काळात पाणलोट क्षेत्रात बांधकामांवर नियंत्रण आणले गेले नाही; तर संपूर्ण धरणातील पाण्याला क्षारयुक्त होण्याचा धोका असल्याचे 'सीडब्ल्यूपीआरएस'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यातील शेतीलादेखील या धरणातून पाणी पुरविले जाते. या धरणाची लांबी एक हजार ५३९ मीटर आणि उंची ३२.९० मीटर आहे. धरणातील पाणीसाठ्याची क्षमता ८६ दशलक्ष घनमीटर असून, पाणीसाठयाचे क्षेत्रफळ १४.९० वर्ग किलोमीटर आहे. या धरणातून मुठा उजवा कालवा आणि मुठा डावा कालवा यांना पाणीपुरवठा केला जातो. उजवा मुठा कालव्यातून पुणे जिल्ह्याच्या परिसराला; तर डावा मुठा कालव्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो.
कांबळे खुनाच्या घटनेत आरोपी आणि साक्षीदार एकाच ठिकाणचे असल्याने या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दत्तवाडी पोलिसांनी कांबळे विरोधी गटातील दोघांना ताब्यात घेतले आहे. कांबळे गटातील भालशंकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट