'देशातील साडेतीन लाख खेड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध उपलब्ध होत नाही. त्यामुळे मंगळयानापेक्षा या लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,' असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
स्व-रूपवर्धिनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, सजग नागरिक मंच व ग्राममंगल संस्थेच्यावतीने 'अशी हवी आम्हाला लोकशाही' या युवा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. चौधरी बोलत होते. ग्राममंगल संस्थेचे प्रा. रमेश पानसे, मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर, स्व-रूपवर्धिनीचे कार्याध्यक्ष कल्याण वर्दे, उपाध्यक्ष उदय गुजर, सजग नागरिक मंचचे जुगल राठी आदी यावेळी उपस्थित होते.
'व्हिजन २०५०'चे नियोजन करण्यापेक्षा आता खेड्यापाड्यांत काय समस्या आहेत, हे लक्षात घेऊन शाश्वत विकाससाठी प्रयत्न केले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेल्या व्हिजन १९५० या स्वप्नातील घटकांचा विचार करून पावले उचलली असती, तर आज भारताची प्रगती झाली असती,' असेही डॉ. चौधरी म्हणाले. आपल्याकडे अस्तित्त्वात असलेली लोकशाही खरोखरच लोकांच्या मनातून आली आहे का, यावर चिंतन करण्याची गरज आहे. हुकूमशाहीचा हट्ट केवळ हुकूमशाहीचा अनुभव नसलेले लोक धरू शकतात ; परंतु हुकूमशहा आणि हुकूमशाही ही कोणालाच परवडणारी नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
'सौरऊर्जेत संशोधनाची गरज'
वर्षातील १० महिने भारताला सूर्य प्रकाश मिळतो. गेल्या काही वर्षांत सौर ऊर्जेचे महत्त्व वाढत आहे. पण, तरीदेखील आपल्याकडे एकही सौरऊर्जा संस्था उभारण्यात आली नाही. त्यामुळेच सौरऊर्जा महाग आहे. या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर संशोधन झाल्यास सौरऊर्जाही स्वस्त होईल, असे डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट