येरवडा येथील सरकारी निवासस्थानांमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसह अनेकांनी वर्षानुवर्षे ठाण मांडले आहे. या सरकारी घरांमध्ये अनेकांनी तर चक्क बेकायदा पोटभाडेकरू ठेऊन उत्पन्नाचे स्रोतही निर्माण केले आहेत. अपात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही घरे बळकावल्यामुळे पुण्यात बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी वणवण करावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा ३८ कर्मचाऱ्यांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. या सरकारी घरांमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही. कारवाई होत नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी घरांच्या दर्शनी भागात कुंपण घालून अतिक्रमणेही केली आहेत.
शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी घरांचे वाटप करण्यात येते. बदली झाल्यावर वा सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सरकारी घर रिकामे करणे अपेक्षित आहे. परंतु, येरवड्यातील शास्त्रीनगर व भीमाशंकर निवासस्थानांमध्ये अनेकांनी वर्षानुवर्षे या घरांमध्ये ठाण मांडले आहे. सरकारी निवासस्थान पदरी पडलेल्या सोळा कर्मचाऱ्यांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. वास्तविक, त्यांना भाडेकरू ठेवण्यास परवानगी नाही. शासकीय सेवेतून बडतर्फ झालेल्या बी. आर. चौधरी यांनी अद्याप घराचा ताबा सोडलेला नाही तर एका कर्मचाऱ्याने आपल्या सासू व सासऱ्यांसाठी हे सरकारी घर देऊन त्यांची निवासाची सोय केली आहे.
सेवानिवृत्त झालेल्या सात कर्मचाऱ्यांनी निवासस्थान सोडण्यास नकारच दिला आहे. एका बहाद्दर कर्मचाऱ्याने तर दोन घरांवर ताबा ठेवला आहे. शासकीय सेवेत असताना मृत्यू झालेल्या काही कर्मचाऱ्यांच्या वारसांनी हे घरे आपल्याच ताब्यात ठेवली आहेत. या कर्मचाऱ्यांनी अनाधिकाराने घरे ताब्यात ठेवली असली तरी ती काढून घेण्याची कारवाई झालेली नाही. पुण्यात बदली होऊन आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यामुळे सरकारी घरांच्या प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांनी केली बेकायदा बांधकामे
सरकारी घरांचा अनाधिकाराने ताबा ठेवलेल्या काही कर्मचाऱ्यांनी चक्क बेकायदा बांधकामे केली असल्याचे सांगण्यात आले. तळमजल्यावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घराच्या दर्शनी भागात कुंपण घालून जागा बळकावली आहे. या अतिक्रमणांचा अन्य रहिवाशांना त्रास होतो. त्यासंबंधी तक्रार करूनही कारवाई होत नाही. ही अतिक्रमणे कोणी काढायची हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट