म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
रस्त्याविषयीच्या आंदोलनातून उडालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी एकूण १८९ लोकांविरोधात गुन्हा दाखल करून जवळपास पावणेदोनशे जणांना अटक केली होती. त्यातील १८ जणांना शनिवारपर्यंत (२३ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर १३ अल्पवयीन आंदोलक मुलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्यांच्या सुटकेसाठी अन्य गावकऱ्यांची शुक्रवारी चांगलीच धांदल उडाली होती. पुण्यातील पोलिस ठाण्यांमधील तुरुंगात १८ जणांना ठेवण्यात आले असून, ७४ महिला आणि ८० जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
श्रीरंग ज्ञानोबा दोधाडे (५०), गुलाब भीमराव भालेराव (२७), अमित हनुमंत घुले (२७), रोहन शांताराम घुले (३१), विकास दुदाम गोगावले (५७) अमर नरेश वाल्मिकी (२०), रवींद्र गुलाब घुले (३६), दत्तात्रय ज्ञानोबा घुले (४०), प्रभाकर तुकाराम सरवदे, चेतन श्रीकृष्ण देवकर (४५), सुमित विजय कदम (२२), दीपक पाटीलबुवा घुले (३०), इसान मोहम्मद शेख (३४), शाम कालीचर मेवाती (३८), संदीप धोंडिबा चौघुले (३१), राहुल ललनकुमार धुसिया (२४), निखिल सुरेश घुले (२५, सर्व रा. बोपखेल), बाबू शंकर राठोड (३०, रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या आंदोलकांची नावे आहेत.
२८ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले असून, यामध्ये दोन सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकदेखील मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत.
गावातील चौकांमध्ये, रस्त्यांवर दगड, बाटल्या, चपलांचा पडलेला खच शुक्रवारीही कायम होता. दंगल, सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध गंभीर गुन्हे आंदोलकांवर दाखल करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे; मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने लष्कर या आंदोलनापासून काही पावले लांबच होते. सैन्य आणि आंदोलक जर समोरासमोर आले असते, तर गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागले असते, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट