पुणे-मुंबई एक्सप्रेस वे-वर चारचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात आईसह तीन वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रायगड जिल्ह्यातील रासायनीजवळील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनच्या दरम्यान झाला. अपघात झाल्यानंतर चारचाकीने पेट घेतला.
सोनम महेंद्र लोहार (वय २८), उर्वी महेंद्र लोहार (वय तीन वर्षे, दोघीही रा. शंकरशेट रोड, पुणे ) असे अपघात होरपळून मृत्यू झालेल्या मायलेकीचे नाव आहे. जखमींमध्ये चालक महेंद्र रघुनाथ लोहार (वय ३४), भारत हनुमान लोहार (वय ३३), दीप्ती सुरेश लोहार (वय १३), नारंगी सुरेश लोहार (वय ३५), आणि करण महेंद्र लोहार (वय ७, रा. सर्व शंकरशेठ रोड, पुणे) यांचा समावेश आहे.
रासायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील लोहार परिवारातील सात सदस्य हे त्यांच्या मारुती अल्टो कारने (एमएच १२ केवाय ११६९) काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते रात्री पुन्हा पुन्हा घरी परतत असताना अतिवेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गालगतच्या पुलावरील दुभाजक तोडून सुमारे १५ ते २० फूट खोल नाल्यात कोसळली. कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याने सोनम आणि उर्वी या दोघींचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर इतर पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच रासायनी पोलिस व पळस्पे महामार्गाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील जखमींना उपचारासाठी पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महेंद्र लोहार यांच्या विरोधात हलगर्जीपणाने भरधाव वेगात गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास रासायनी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब स्वामी करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट