सय्यद नगर - ससाणेनगर रेल्वे फाटक येथे कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गाचे काम वेळेवर पूर्ण व्हावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या कामासाठी ज्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या आहेत, त्या जमीनमालकांना योग्य मोबदला दिला जाईल, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
सय्यदनगर-ससाणेनगर रेल्वे फाटकातील भुयारी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. भूमिपूजनाच्या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक वैशाली बनकर, फारूख इनामदार, विजया वाडकर, विजया कापरे ,चेतन तुपे, रंजना पवार, चंचला कोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना महापौर धनकवडे म्हणाले, 'या भुयारी मार्गाच्या कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही. या भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक त्या पर्यायी रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या कामासाठी वाहतूक वळविणे सोपे जाईल. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.'
श्रेयासाठी चढाओढ
या भुयारी मार्गाच्या श्रेयासाठी पत्रक छापून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चढाओढ दिसून आली. काँग्रेस आणि राष्ट्रावादीकडून भुयारी मार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पत्रकेही छापण्यात आली होती. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी हा भुयारी मार्ग नियोजनात नाहीच, असे फ्लेक्स लावले असून, या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
असा असेल भुयारी मार्ग लांबी : ५५ मीटर उंची : ५.५० मीटर पादचारी मार्गाची रुंदी : ३.५ मी. पादचारी मार्गाची उंची : २.५ मी. अपेक्षित खर्च : ३८ कोटी ४८ लाख चालू आर्थिक वर्षातील तरतूद : ५ कोटी ७६ लाख
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट