Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्कॉलरशिप धोरण’ लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्कॉलरशिप वाटपासाठी राज्याचे 'स्कॉलरशिप धोरण' लवकरच निश्चित केले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्या धोरणानुसार स्कॉलरशिपचे वाटप केले जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी पुण्यात शुक्रवारी दिली.

स्कॉलरशिप धोरण ठरविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व उच्च तंत्रशिक्षण विभागाची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीद्वारे स्कॉलरशिप वाटपाच्या प्रचलित पद्धतीचा अभ्यास, त्यामध्ये येणारे तांत्रिक अडथळे, लाभार्थी निवडीचे निकष, कोणत्या-कोणत्या अभ्यासक्रमांना स्कॉलरशिप देणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जाईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे या समितीचा अहवाल पुढील दोन महिन्यात येणे अपेक्षित असल्याचे बडोले यांनी स्पष्ट केले. ते एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे या वेळी उपस्थित होते.

चौथीपासून पदव्युत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांपर्यंत पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप प्रदान करताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे निकष भिन्न आहेत. राज्य सरकारच्या निकषांनुसार पात्र असलेले लाभार्थी केंद्र सरकारच्या काही निकषांमध्ये बसत नाहीत. या उलट केंद्राच्या निकषांनुसार पात्र असणारे विद्यार्थी राज्य सरकारच्या निकषांनुसार पात्र ठरत नाहीत. या प्रकारामुळे बहुतांश विद्यार्थी स्कॉलरशिपपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्कॉलरशिप योजनेची अंमलबजावणी करताना निकषांतील तफावतींमुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सर्वांना एक निकष असावा, या उद्देशाने हे धोरण ठरविण्यात येणार आहे, असे बडोले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हंगामी कामगार कायम होणार

$
0
0

पुणे : आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) हंगामी आणि बदली कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे. तृतीय श्रेणीत ८५ दिवस, तर चतुर्थ श्रेणीत ७० दिवस काम केलेल्या हंगामी कामगारांना नोकरीत सामावून घ्यावे; तसेच ज्यांचे वय निवृत्तीच्या पुढे गेले आहे, अशांना लाभ द्यावेत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष विनायक घारपुरे, सरचिटणीस चंद्रकांत तिवारी आणि नंदकिशोर जागडे यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय विमा कामगार संघटनेच्या पुढाकाराने १९८५ नंतरच्या हंगामी वा बदली कामगारांनी १९९१ मध्ये केंद्रीय आयोगापुढे दावा दाखल केला होता. २००१ साली त्याचा कामगारांच्या बाजूने निकाल लागला. त्या विरोधात महामंडळाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. दिल्ली हायकोर्टाने हा निकाल रद्दबातल ठरवला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. १८ मार्च २०१५ रोजी झालेल्या सुनवाणीत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय आयोगाचाच निर्णय कायम ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तात फ्लॅट विकणारे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

स्वस्तात फ्लॅट विकण्याच्या आमिषाने पंचवीसपेक्षा अधिक नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. अंकुश बबन वडे (वय २९ रा. पालघर) योगेश रघुनाथ करांडे उर्फ युवराज राजाराम गडकरी उर्फ युसूफ मकलाई उर्फ नंदकुमार कुंबले उर्फ राज चव्हाण (वय ३१ रा. हडपसर) आणि आकाश उर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार स्वरूप शर्मा उर्फ राज शुक्ला उर्फ सूरज राकेश चौबे आणि रोहन पाटील फरारी झाले आहेत. शर्माने मुंबईतही अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपींना ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त श्याम मोहिते यांनी दिली.

योगेश करांडे आणि स्वरूप शर्मा यांनी विमाननगरमध्ये 'ऑल मॅक्स रिअॅलिटी एकर्स' नावाची कंपनी स्थापन कली होती. शहराच्या विवध भागांत स्वस्तात फ्लॅटविक्रीचे आमिष या कंपनीने जाहिरातीद्वारे दाखवले होते. या जाहिरातीला भुलून अनेक मोठ्या ग्राहकांनी संपर्क साधला होता. येणाऱ्यांना विविध भागांतील बांधकामे दाखवून त्यांनी विश्वास संपादन केला होता. त्यानंतर या बनावट इस्टेट एजंटांनी महिनाभरात पंचवीस इंजिनीअरकडून एक कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करून पलायन केले. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी काही इंजिनीअर विमाननगर येथील कंपनीत आले असता, ऑफिस बंद असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता कंपनीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर, विठ्ठल दरेकर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक प्रताप कोलते, पोलिस कर्मचारी उसुलकर, चंद्रकांत जाधव, नवनाथ वाळके, अविनाश संकपाळ, अमित जाधव यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यात मोलाची कामगिरी बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज-नसरापूर पीएमपी बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

खेडशिवापूर येथील टोल नाक्यावर १७,७१,६६५ रुपयांचा टोल थकल्याने कात्रज ते नसरापूर दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी पीएमपीची बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पीएमपीची सुरुवातीला स्वारगेट आणि नंतर कात्रज येथून गेली अनेक वर्षे ६१ क्रमांकाची बस सेवा सुरू आहे. या बसमध्ये पासधारकांची संख्या अधिक आहे. या प्रवासादरम्यान खेडशिवापूर येथे टोलनाका पार करावा लागतो. पीएमपी सुरुवातील या नाक्यावरील टोल प्रवाशांकडून तिकिटाशिवाय १ रुपया अतिरिक्त वसूल करून भरण्यात येत होता. कालांतराने या मार्गावरील प्रवासी संख्या घटली. या मार्गावर तोटा होऊ लागल्याने व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वी ही बससेवा बंद केली. तेव्हा नसरापूरमधील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. टोल आकारणी होणार नाही; बस सेवा पुन्हा सुरू करा अशी विनंती करण्यात आली. या चर्चेनुसार बस सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांमध्ये टोल वसुली करण्यात आली नाही.

दरम्यान, जानेवारीमध्ये अचानक खेडशिवापूर नाक्यावर टोल वसुली करणाऱ्या पीएस कंपनीने पीएमपीएलला लेखी पत्राद्वारे १७ लाख रुपयांची थकित रक्कम भरण्याविषयी कळवले. पीएमपीएल ही रक्कम भरू शकत नसल्याचे उत्तर देण्यात आले. पीएमपीएलने ते पत्र नसरापूर ग्रामपंचायतीकडे पाठवले. त्यावर टोलमाफीबाबत आपण पीएमपीला कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. या प्रकरणी स्थानिक आमदार इतर लोकप्रतिनिधींनी टोलबाबत मध्यस्थी करून मार्ग काढावा, असे पत्र दिल्याचे आपण दिल्याचे सरपंच ज्योती चव्हाण यांनी सांगितले.

प्रवाशांपेक्षा पीएमपीचे कर्मचारीच अधिक

सध्या या बसच्या प्रतिदिन चार ते पाच फेऱ्या होतात. परंत, त्या बसमधून प्रवाशांपेक्षा पासधारक आणि पीएमपीएलचे कर्मचारीच अधिक प्रवास करतात असल्याचे दिसून आले आहे. पूर्वीप्रमाणे प्रवाशांकडून पथकर वसूल करण्यास काहीही हरकत नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही बस पुन्हा सुरू व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपावर साखळीचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेली. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अपूर्वकुमार मिश्रा (२६, रा. सनसिटी रोड) यांनी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हा दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सिंहगड रोडवरील रांका ज्वेलर्ससमोरील पेट्रोल पंपावर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेली.

शिवीगाळ करून मारहाण

व्यक्तीला शिवीगाळ तसेच मारहाण करून त्याच्याकडील २१ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुमीत महादेव जगताप (वय २८, रा. कपिलनगर कोंढवा) आणि जगदीश उर्फ जग्या या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जगतापला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रमोद झा (३९ रा. कोंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे कोंढवा बुद्रुक येथील श्रीनाथ पानटपरीवर गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता पान खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

महिलेची आर्थिक फसवणूक

कर्ज प्रकरण केले असतानाही मंजुरीसाठी कमिशन आणि कर्जाच्या हप्त्याची रक्कम घेऊन एका महिलेची १,३६,७३३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एका एजंटचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी राकेश शर्मा, रितेश साळवी, अनिल चव्हाण या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध राजेश्वर सातपुते (४० रा. धायरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या फ्लॅटची मूळ कागदपत्रे मिळवून त्यावर कर्ज प्रकरण केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी फिरवणार पालिकेतील भाकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतील बदलती समीकरणे आणि डीपीबाबत राष्ट्रवादीवर झालेले आरोप पाहता पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेतील सभागृह नेतेपद बदलण्याची शक्यता आहे. पालिकेतील सभागृह नेतेपद बदलण्याबाबत आज (शनिवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात येणार असून, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होऊ शकतो.

महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, सुभाष जगताप यांच्याकडे सभागृह नेते पद आहे. जगताप गेली अनेकवर्षे सभागृह नेतेपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने जगताप यांना पर्वतीमधून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या महिन्यात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांच्या घरी लाचलुचपत विभागाने छापा मारला होता. शहराच्या जुन्या हद्दीचा नवीन विकास आराखडा (डीपी) तयार करताना राष्ट्रवादी काँग्रेसने डीपीतील अनेक आरक्षणे बदलण्याचा आरोप होत असल्याने पालिकेत पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. नुकत्याच झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतही सभागृह नेते असलेल्या जगताप यांनाच संधी देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने आपला पाठींबा शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर केल्याने तेथेही जगताप यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.

बराटे, केमसे इच्छूक

सभागृह नेते पदासाठी माजी उपमहापौर दिलीप बराटे तसेच ज्येष्ठ नगरसेवक बंडू केमसे इच्छूक आहेत. खडकवासला मतदारसंघातून बराटे यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट देऊन संधी दिली आहे. मात्र केमसे यांना अद्यापपर्यंत कोणतेही महत्वाचे पद दिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत जारमधून अशुद्ध पाणी

$
0
0

संतराम घुमटकर, बारामती

सरकारी नियमांमधून पळवाटा शोधून घरी-ऑफिसमध्ये जारच्या माध्यमातून अशुद्ध पाणी पुरविण्याचा धंदा 'पाणीमाफियां'नी मांडला आहे. सरकारी अधिकारीवर्गाकडून कारवाईकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रयोगशाळांसारख्या पायाभूत सुविधांची वानवा, अशा परिस्थितीत शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरू आहे.

या पाण्याच्या जारवर 'पिण्याचे पाणी' असे लेबल लावणे बंधनकारक नसल्याने कारवाई करण्यावर मर्यादा येत आहेत, अशी तांत्रिक सबब सरकारी अधिकाऱ्यांकडून पुढे केली जात आहे.

वास्तविक, हे पाणी किती प्रमाणात सुरक्षित, शुद्ध आहे, याची तपासणी एफडीए प्रशासनाने करण्याची गरज आहे, पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रणाच अनेक ठिकाणी नसल्यामुळे पाणी उद्योजकांनी नागरिकांच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकत बंद दरवाजात हा पाणीउद्योग जोमात सुरू आहे. बारामतीत जारमधून दररोज लाखो रुपयांच्या विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या दर्जाची कोणतीही खात्री नाही. शहरातील जारच्या पाण्याची विक्री विनापरवाना होत असल्याने अन्न औषध प्रशासनाने छापे टाकून तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बारामती तालुक्यात जारमधून पाणीपुरवठा करणारे दहाहून अधिक उद्योजक विना परवानाधारक आहेत; तर फक्त तीन उद्योजक परवानाधारक आहे. अधिकृत उद्योगांवर भारतीय मानक ब्युरो कारवाई करू शकतो. मात्र, अनधिकृत उद्योगांवर कारवाई करणे त्यांना शक्य होत नाही. शुद्धतेसाठी असलेल्या १४ प्रक्रिया करण्याकडे बहुतांश विक्रेते टाळाटाळ करत आहेत. तसेच, २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियमही सर्रास पायदळी तुडवला जात आहे.

तपासणीशिवाय पाणी आरोग्यास धोकादायकच !

पाण्यातील क्षार, विषाणू, क्लोराइड्‌सह घातक द्रव्य बाजूला काढण्याचे तसेच स्वच्छता, पॅकिंग यासंदर्भातील निकष अत्यंत कडक आहेत. मात्र, हे निकष पाळलेच जात नाहीत. केवळ काही जुजबी प्रक्रिया करून पाणी ग्राहकांच्या माथी मारले जाते. ग्राहकही आकर्षक पॅकिंगला बळी पडून पाणी विकत घेतात. मात्र, हे पाणी आरोग्यास घातक असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अशुद्ध पाणी माफिया आढळून आल्यास नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या विक्रेत्यांची गय केली जाणार नाही

- संजय बारगुडे, सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन

अशुद्ध पाणी पिण्यामुळे अतिसार, पोटाचे विकार, ताप, आम्लता पचनसंस्थेचे त्रासदायक विकार. विद्राव्य क्षार थायरॉइड्‌स, मुतखडा, किडनीचे विकार असे आजार होतात. त्यामुळेच, पाण्याची शुद्धता राखणे गरजेचे आहे.

- डॉ. बी. ए . भोई,वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल

'आयएसआय' मार्क असलेल्या परवानाधारकावर कारवाई करता येते किंवा आयएसआय मार्कचा गैरवापर केल्यास आम्हांला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणताही परवाना नसल्यास ही कारवाई आमच्या आवाक्याबाहेरची असून एफडीए प्रशासनच संबंधित उद्योजकांवर कारवाई करू शकते.

- बी. एफ. हानिफ, भारतीय मानक ब्युरो, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांना यंदा पाणीटंचाई नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरातील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला पुनर्वापरासाठी देण्याचा प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे यंदा पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या आवर्तनाच्या पाण्याची टंचाई भासणार नाही,' अशी हमी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी दिली. राज्यातही पंधरा जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेल, इतका साठा असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली.

मुंढवा येथे जॅकवेल उभारून शहरातील प्रक्रिया केलेले पाणी बेबी कॅनॉलद्वारे शेतीला देण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. बापट आणि शिवतारे यांनी तेथे भेट देऊन या कामाची पाहणी केली. नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, तहसीलदार डी. एस. कुंभार आदी या वेळी उपस्थित होते.

'सध्या जॅकवेलपासून बेबी कॅनॉलपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, रेल्वेलाइनच्या खालून पाइप टाकण्यात येत आहेत. तेथून अडीचशे मीटर अंतरावर साडेसतरा नळी भागात हे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येत आहे. रेल्वे लाइनखालून पाइप टाकण्याचे काम येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागेल,' असे त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातून सहा टीएमसी इतके पाणी शेतीच्या पुनर्वापरासाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा शहरी विरूद्ध ग्रामीण वाद दूर होऊन दोन्हीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

कामाला गती द्या...

महापालिका आणि जलसंपदा विभागाने या कामास अधिक गती द्यावी, अशी सूचना गिरीश बापट यांनी केली. या परिसरात काही नागरिकांनी पाइप टाकण्याच्या कामास विरोध केला होता. त्यांच्याशी बापट व शिवतारे यांनी चर्चा केली असून, नागरिकांना या कामामुळे कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यात ३५ टक्के साठा

राज्यातील धरणांमध्ये सध्या ३५ ते ३७ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती शिवतारे यांनी या वेळी दिली. त्यामुळे पुण्यातही पंधरा जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही आणि शेतीचे उन्हाळी आवर्तनही देता येईल, याची पुरेपूर काळजी घेऊ, असे बापट व शिवतारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समुपदेशनानंतर जुळली मने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तो सीआरपीएफमध्ये, तर ती पोलिसमध्ये... त्यांच्या सुखी संसारात नको इतकी लुडबुड करणाऱ्या घरच्या लोकांमुळे नातेसंबंध तुटले. त्याच्याविरुद्ध तिने कोर्टात ४९८ ची केस दाखल केली. नोकरीला धोका नको म्हणून त्याने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. कोर्टातील न्यायाधीशांनी त्यांची केस समुपदेशनासाठी पाठविली. आणि अखेर त्या दोघांच्या आधी त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून आठ दिवसांत त्यांच्यातील वाद मिटविण्यात यश आले.

आकाश आणि रुपाली (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना अडीच वर्षांचा एक मुलगा आहे. त्यानंतर ती पुन्हा गर्भवती आहे. रुपालीची नोकरी पुण्यातच आहे, तर आकाशची नोकरी पुण्याबाहेर आहे. त्या दोघांच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत. रुपाली पोलिस असल्यामुळे ड्युटीच्या वेळा रात्री अपरात्री आहेत. मात्र, हेच तिच्या सासूला आणि नणंदेला खटकत होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारणांवरून तिला त्रास देण्यास, तसेच त्याचे कान भरण्यास सुरूवात केली. परिणामी त्या दोघांमधील वाद वाढत गेले. शेवटी ती त्याचे घर सोडून निघून गेली. तिने त्याच्याविरुद्ध कोर्टात ४९८ ची केस दाखल केली.

या केसमध्ये अटक होऊ नये, म्हणून त्याने विशेष न्यायाधीश एस. एम. जोशी यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने या अर्जाची दखल घेऊन प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांच्याकडे ही केस समुपदेशनासाठी पाठविली. त्यांच्या दोघांमधील वादापेक्षा घरच्यांची लुडबूड जास्त असल्याचे लक्षात आले. त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाचे भवितव्य आणि होणाऱ्या बाळाची काळजी याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यात आले. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. समुपदेशनामुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

सुखी संसार तुटण्यास गैरसमज कारणीभूत

कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दाखल केलेल्या केसला वेगळी कलाटणी मिळाली. खरे तर त्या दोघांमध्ये असलेला वाद तसा कमीच होता. त्यांच्या संसारात त्याची आई आणि बहिण तर तिच्या माहेराकडून आई, वडील आणि भावाची लुडबूडच जास्त होती. त्यांच्यामुळे होत असलेले गैरसमज एक सुखी संसार तुटण्यास कसा कारणीभूत ठरतो आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यांच्यातील वादाचे निराकरण केल्यामुळे ४९८ ची केस मागे घेत ती त्याच्याबरोबर नांदायला गेली, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी केलेल्या समुपदेशनामुळे ही केस निकाली काढण्यात यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी उत्पन्नाला गळती

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

महापालिकेतील जकात रद्द करून त्याऐवजी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३५ ते १४० कोटी रुपयांनी घटल्याचे दिसून आले आहे.

वाढते शहरीकरण आणि चारही दिशांना होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शहरात विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले. तरी, त्यातून मिळणारा एलबीटी मात्र अद्याप पालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्याने शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणेच जवळपास बंद केले आहे.

राज्यातील जकात रद्द करून त्याऐवजी एलबीटी सुरू करावा, अशी राज्यातील व्यापाऱ्यांची आग्रही मागणी लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सर्व महापालिकेतील जकात रद्द करून त्याऐवजी पालिका स्तरावर एलबीटी आकारण्याचे आदेश दिले होते. पहिले तीन ते चार महिने अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंदणीच पालिकेकडे केली नव्हती. त्यानंतर शासनाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने हळूहळू एलबीटी भरण्याची शिस्त व्यापाऱ्यांना लागली. जकातीऐवजी सुरू करण्यात आलेला एलबीटीही रद्द करण्याची मागणी सुरुवातीपासून व्यापाऱ्यांनी केली होती. एलबीटी रद्द केल्यास महापालिकांचा आर्थिक डोलारा कोसळून पडेल, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने आघाडी सरकारने एलबीटी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकींना सामोरे जाताना सत्तेवर आल्यानंतर एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन भाजपने दिले. निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्याने शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणे बंद केले. परिणामी ऑक्टोबर २०१४ पासून पालिकेला एलबीटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न घटण्यास सुरुवात झाली. प्रति महिना २० ते २५ कोटी रुपयांचा खड्डा पडत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एलबीटीमधून १३५ ते १४० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.

सराफांचा आक्षेप

सराफांनी एलबीटी बुडविल्याबाबत पुणे महापालिकेने जाहीर केलेली यादी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्टीकरण सराफ व्यावसायिकांनी दिले आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी गेल्या आर्थिक वर्षांत काही कोटी रुपयांचा एलबीटी राज्यातील विविध महापालिकांकडे भरला आहे, असे स्पष्टीकरण पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अमित मोडक यांनी दिले आहे. रांका ज्वेलर्सतर्फेही फत्तेचंद रांका यांनी आमचे अकाउंट्स येऊन तुम्ही तपासू शकता, असे स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या वर्षी मार्चअखेर पालिकेला एलबीट‌ीच्या माध्यमातून १,२८८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी मात्र, पालिकेला १,१४६ कोटीवर समाधान मानावे लागले आहे.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोन बदलाला दणका

$
0
0

धनंजय जाधव, पुणे

'शेती' तसेच 'शेती व ना विकास झोन'मधील जमीन 'निवासी झोन'मध्ये बदलून त्याजागी इमल्यांवर इमले बांधण्याच्या बिल्डरधार्जिण्या कृतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे. झोन बदलाच्या कोणत्याही फाइल थेट राज्य सरकारकडे न पाठविता विभागीय आयुक्त स्तरावर छाननी करून पाठविण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

झोन बदलाची फाइल नगर विकास विभागाकडे दाखल झाल्यावर या फेरबदलाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांसह तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. झोन बदलाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसणाऱ्या फाइल्सवर या समितीमार्फत शेरा मारला जाणार आहे. त्यानंतर फेरबदलाच्या अंतिम मान्यतेसाठी फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या जाणार आहेत.

प्रादेशिक योजनांमधील जमिनीच्या झोनचे आरक्षण महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम २० (२) अन्वये बदलण्याची प्रक्रिया करता येते. या कलमाच्या धारे 'शेती' तसेच 'शेती ना विकास विकास' झोनमधील जमीन रहिवास झोनमध्ये बदलण्याच्या फाइल्स बिल्डरकडून दाखल केल्या जातात. झोन बदल झाल्यानंतर त्यावर निवासी इमारती बांधून बिल्डर मंडळी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवितात. मात्र, हा बदल बिल्डर्सच्या जमिनींपुरताच होत असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी शेती झोनमध्येच राहतात.

प्रीमियम आकारणीचा प्रस्ताव

शेती झोन, शेती व ना विकास झोन तसेच इंडस्ड्री, डोंगर व डोंगर उतार अशा जमिनींचे झोन बदलण्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे येतात. या जमिनी निवासी झोनमध्ये बदलून त्यावर इमारती उभ्या केल्या जातात. या झोन बदलासाठी तूर्त कोणताही आकारणी केली जात नाही. आता मात्र, झोन बदलासाठी प्रिमियम आकारणी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

ठळक निर्णय

जमिनीच्या झोन बदलाच्या फाइल थेट मंत्रालयात जाणार नाहीत

झोन बदलाच्या तपासणीसाठी विभागीय आयुक्तांची समिती

झोन फेरबदलाची प्राथमिक चौकशी समिती करणार

एकट्या बिल्डरसाठी झोन बदल होणार नाही

समितीच्या ग्रीन सिग्नलनंतरच मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेल प्रशासनाकडून छळ होत असल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परशा जाधवच्या खुनात जेलमध्ये असलेला आरोपी शिवाजी उर्फ बाळू चौधरीने सुरक्षेच्या नावाखाली आपल्याला अंडा सेलमध्ये ठेवून जेल प्रशासनाकडून छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपल्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा तक्रार अर्ज कोर्टात केला आहे. आपल्याला जिवाला धोका असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने अर्जात केली आहे.

बाळू चौधरीच्या केसची कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. त्याला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले असता त्याने सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या कोर्टात हा अर्ज दाखल केला आहे. चौधरीतर्फे अॅड. भारती जागडे काम पाहत आहेत. चौधरीला येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या नावाखाली आपला छळ करण्यात येतो आहे. तसेच, आपल्याकडून जेलमधील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पैसे घेतले असल्याचा आरोप त्याने अर्जात केला आहे. जेलमधील अधिकारी संतोष कोकणे, वामन निमजे, कानसकर यांचा ग्रुप असून त्यांना जेल अधीक्षक योगेश देसाईंचा पाठिंबा आहे. जे कैदी हप्ता देत नाहीत त्यांचा छळ केला जातो. त्यांच्याविरुद्ध खंडणी आणि जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'RTE'ची लॉटरी फेरीचे प्रवेश १५ एप्रिलपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठीची ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया शनिवारी पुण्यात पार पडली. या लॉटरीच्या आधारे प्रवेश संख्येपेक्षा जास्त अर्ज आलेल्या शाळांमधील आरक्षित जागांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. हे प्रवेश घेण्यासाठी पालकांना येत्या १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील 'आरटीई'च्या आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी ही लॉटरी फेरी राबविण्यात आली. सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या सभागृहात झालेल्या या फेरीसाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने, पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांच्यासह खात्यातील इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी केलेल्या पालकांच्या समोर या वेळी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. लॉटरीमधून समोर आलेल्या आकड्यांच्या आधारे पुढील दोन दिवसांमध्ये कम्प्युटराइज्ड पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. प्रवेश अंतिम झालेल्या विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली जाणार असल्याचे या वेळी माने यांनी जाहीर केले.

नव्याने अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांमधून २५ टक्क्यांच्या आधारावर यापूर्वी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सवलती नाकारल्या जात असल्याचे प्रकार नुकतेच समोर आले होते. 'मटा'ने त्या विषयीचे वृत्त प्रसिद्ध करत, सरकारने या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज अधोरेखित केली होती. या पार्श्वभूमीवर माने यांनी अशा शाळांनी यापूर्वी आरक्षित जागांवर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सवलती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक यापूर्वीच काढण्यात आले असून, अशा शाळांना योग्य तो फी परतावाही दिला जाणार असल्याचे माने यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींची फसवणूक; २ नातवांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा/पिंपरी

अशिक्षित आजोबांना नवीन कपडे घेण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेऊन त्यांच्या नावावर असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन धमकावून विकणाऱ्या दोन नातवांसह एजंटवर दिघी पोलिस ठाण्यात अपहरण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजोबांना रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेत वेगवेगळ्या कागदपत्रांवर अंगठे घेऊन परस्पर जमिनीची विक्री करणाऱ्या आर्थिक व्यवहारात शहरातील काही नामवंत बिल्डरांचा समावेश आहे. साधू महादेव पठारे (वय ७७ रा.पठारे मळा, चऱ्होली) असे फसवणूक झालेल्या आजोबांचे नाव असून या प्रकरणी संदीप दत्तात्रय जगताप, किशोर दत्तात्रय जगताप, सादिक हमीद इनामदार (रा. चऱ्होली) आणि नवनाथ भगवान तपकीर (रा. वडमुखवाडी) या आरोपींविरोधात अपहरण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप आणि किशोर हे दोघे सख्खे भाऊ असून साधू पठारे त्यांचे आजोबा आहेत .

साधू पठारे यांच्या नावावर चऱ्होली परिसरात जमीन आहे. कपडे घेण्याच्या बहाण्याने संदीप आणि किशोर यांनी पठारे यांना शेतात नेले. तेथून डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावर आणल्यानंतर सादिक आणि नवनाथ यांचासोबत कारमध्ये पिंपरीतील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घेऊन गेले. ऑफिसमध्ये या चौघांनी पठारे यांना धमकावून जबरदस्तीने वेगवेगळ्या कागदपत्रांवर अंगठे मारून घेतले. व सायंकाळी पठारे यांना अर्ध्या वाटेत सोडून पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘PMP’ला पालिकेकडून ५.२५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अडचणींच्या गर्तेत सापडलेल्या पीएमपीला आर्थिक साह्य देण्यासाठी महापालिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. पीएमपीची तूट भरून काढण्यासाठी येत्या बारा महिन्यांत दरमहा सव्वापाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.

गेल्या काही काळापासून पीएमपीचे चाक आर्थिक अडचणींमध्ये फसले आहे. त्यानंतर पीएमपी सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनेही पावले उचलली होती. त्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपीमध्ये विविध योजना हाती घेतल्या. त्यापाठोपाठ महापालिकेनेही पीएमपीला येणारी तूट भरून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. तुटीच्या रकमेपैकी काही भार महापालिकेने उचलावा, अशी मागणी पीएमपीने केली होती. महालिकेकडून पीएमपीची तूट भरून काढण्यासाठी वार्षिक रक्कम एकत्रितपणे देण्यात येते, त्याऐवजी ती दर महा समान हप्त्यांमध्ये दिली; तर ते उपयुक्त ठरेल, असे पीएमपीने म्हटले आहे.

पीएमपीसाठी बजेटमध्ये यंदा ७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दहा कोटी रुपये बाजूला ठेवून उरलेले ६३ कोटी रुपये बारा हप्त्यांमध्ये पीएमपीला द्यावेत, असे पत्र महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी दिले होते. त्यानुसार लेखापालांनी तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. दरमहा दहा तारखेपूर्वी ही रक्कम देण्यात येणार आहे. पीएमपीला या आर्थिक वर्षात किती तूट येते, याचे ऑडिट महापालिका करणार असून त्यानुसार पीएमपीला किती देय रक्कम आहे आणि त्यामध्य महापालिका किती वाटा उचलणार, हे निश्चित करण्यात येईल आणि ही रक्कम पुढील वर्षी मार्चमध्ये देण्यात येईल, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिजिक्स, मॅथ्ससाठी कस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंजिनीअर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी आयोजित 'जेईई-मेन्स'च्या लेखी परीक्षेच्या टप्प्यामध्ये फिजिक्स आणि गणिताच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांचा चांगलाच कस पाहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही विषयांचे प्रश्न अवघड गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून नोंदविण्यात आली.

इंजिनीअरिंगची प्रवेशपूर्व परीक्षा असलेल्या 'जेईई'चे देशभरात सीबीएसईच्या माध्यमातून आयोजन केले जाते. पेन-पेपर आणि ऑनलाइन अशा दोन प्रकारांमध्ये ही परीक्षा होते. त्यापैकी पेन-पेपर प्रकारातील परीक्षा शनिवारी झाली. पुण्यातूनही विद्यार्थ्यांनी हजोरांच्या संख्येने या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. शहरातील केंद्रीय विद्यालयांच्याच जोडीने काही मोजक्या कॉलेजांमधून या परीक्षेसाठीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

दोन सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेदरम्यान या परीक्षाकेंद्रांबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या मार्गदर्शकांनीही फिजिक्स आणि गणित अवघड गेल्याच्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

विद्यार्थ्यांसाठी फिजिक्सचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त लेखी आणि वेळखाऊ ठरला. गणिताचे प्रश्न अधिक आव्हानात्मक होते; तर तुलनेत केमिस्ट्रीचा पेपर सोपा ठरल्याची माहिती 'आयआयटी-पी'च्या दुर्गेश मंगेशकर यांनी शनिवारी दिली. त्यामुळेच ३६० गुणांसाठीच्या या परीक्षेचा यंदाचा 'कट्-ऑफ' १०५ ते ११० गुणादरम्यान राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

यंदाच्या परीक्षेत २०१३ च्या परीक्षेमधील एक प्रश्न जसाच्या तसा आल्याची माहिती 'आयआयटी प्रतिष्ठान'च्या संजय कुलकर्णी यांनी दिली. विद्यार्थ्यांना फिजिक्सचे प्रश्न अवघड गेले असले, तरी केमिस्ट्रीचे प्रश्न सोपे ठरल्याने, परीक्षेचा कट्ऑफ गेल्या वर्षीच्याच जवळपास राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

यंदाच्या परीक्षेसाठीचे बहुतांश प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असल्याचे प्राइम अॅकेडमीच्या ललित कुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी अनेक प्रश्न निव्वळ आकडेमोडीच्या मदतीने सोडविणे शक्य होते. यंदाच्या परीक्षेत आकडेमोडीच्या जोडीनेच संकल्पनांचा अभ्यास असणाऱ्यांनाच प्रश्न सोडविणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची राष्ट्रवादीकडून परतफेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर सुधारणा समिती आणि महिला बालकल्याण समितीची अध्यक्षपदे देऊन वेळोवेळी तटस्थ राहून किंवा पाठिंबा देऊन साथ देणाऱ्या मनसेच्या मदतीची राष्ट्रवादीने 'परतफेड'केली. राष्ट्रवादी, मनसेच्या नव्या पॅटर्नमुळे पालिकेच्या विधी व क्रीडा समितीची अध्यक्षपदे राष्ट्रवादीच्या पदरात पडली.

महापालिकेच्या विषय समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आणि मनसेचे साटेलोटे झाल्याने चारही समित्यांवर या पॅटर्नचे उमेदवार विजयी झाले. शनिवारी या निवडणुका पार पडल्या. साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. समित्यामध्ये राष्ट्रवादीचे पाच, मनसेचे तीन, काँग्रेस व भाजप यांचे प्रत्येकी एक आणि शिवसेनेचा एक, असे तेरा सदस्य आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेची हातमिळवणी झाल्यामुळे शिवसेना व भाजपच्या सर्व उमेदवारांचा या पॅटर्नपुढे आठ विरुद्ध तीन मतांनी पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार नसल्याने त्यांनी या निवडणुकीत मतदान केले नाही. दरम्यान, येत्या १५ एप्रिल रोजी महापालिकेच्या पंधरा प्रभाग समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी सात समित्या राष्ट्रवादीकडे, चार काँग्रेसकडे, दोन भाजपकडे आणि मनसे-शिवसेनेकडे प्रत्येकी एक प्रभाग समिती आहे.शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनसेच्या रूपाली पाटील आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड यांची निवड झाली; तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी मनसेच्या अर्चना कांबळे व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुषमा निम्हण यांची निवड झाली. क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पठारे यांची; तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या मनीषा चोरबेले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विधी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील गोगले; तर उपाध्यक्षपदी मीना परदेशी यांची निवड झाली.

पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने विश्वासघात केला. त्यामुळे विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदानही करता आले. नाही.

- सुभाष जगताप, सभागृह नेते

स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे ठरलेले असतानाही राष्ट्रवादीने विश्वासघात केला. विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला डावलून मनसेबरोबर आघाडी केली. राष्ट्रवादी, मनसेच्या संसाराला शुभेच्छा.

- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाची धुरा नागनुरेंवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नगर विकास विभागाचे सहसंचालक सुधाकर नागनुरे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. प्राधिकरणाचे पहिले सीईओ म्हणून ते पदभार घेणार आहेत. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च रोजी केली. त्यानंतर लगेचच १ एप्रिल रोजी यासंबंधीचे नोटिफिकेशन काढण्यात आले. अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे सोपविताना समितीही जाहीर करण्यात आली.

'पीएमआरडीए'ची स्थापना झाल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी सद्यस्थितीत मुद्रांक व नोंदणी विभागात मूल्य निर्धारणाचे काम करणारे सहसंचालक नागनुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागनुरे यांनी दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चरमधून त्यांनी 'एम. टेक' केले आहे. २००३ ते २००९ या काळात त्यांनी मंत्रालयात उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.

अनुभवामुळे प्राधान्य

'पीएमआरडीए'च्या सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता होती. राज्यातील काही 'आयएएस' अधिकारी या पदासाठी उत्सुक होते. परंतु प्राधिकरणाच्या सुमारे २ हजार ९४३ चौरस किलोमीटर लांबीच्या हद्दीच्या नियोजनबद्ध विकासासाठी अनुभवी टाऊनप्लॅनरची निकड होती. सुधाकर नागनुरे यांना डीपीपासून मूल्यनिर्धारणापर्यंतच्या कामाचा दांडगा अनुभव असल्याने राज्य सरकारने त्यांच्या नावाला पसंती दिली.

एमआरटीपी कायद्यात सुधारणा करून 'पीएमआरडीए'चा प्रस्ताव करण्यात आपला सहभाग होता. आता त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही मोठी जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू.

- सुधाकर नागनुरे, सीईओ पीएमआरडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवार पॅनेल’ पराभवाच्या छायेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत चंदरराव तावरे यांच्या सहकार पॅनेलने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला पराभवाच्या छायेत लोटले आहे. निकाल जाहीर झालेल्या १३ पैकी नऊ जागांवर विजय मिळवून सहकार पॅनेलने आघाडी घेतली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न 'साहेब-दादां'नी वारंवार केले. निवडणुकीत कधी जागांवर तडजोड करून कारखान्यात शिरकाव केला. गेली सात वर्षे कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीकडे होती.

आव्हानाला चंदर तावरे व रंजन तावरे यांनी एकत्र येऊन प्रतिआव्हान दिले. गेले काही प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. या प्रचारामुळे निवडणुकीत ९३ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. शनिवारी मतमोजणी सुरू झाल्यावर विजयाचे पारडे तावरे यांच्या सहकार पॅनेलकडे झुकत असल्याचे स्पष्ट झाले. कारखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागा आहेत. रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या तेरा जागांच्या निकालांपैकी नऊ जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. मात्र, काही जागांवर पुन्हा मोजणी झाल्याचे कळते.

सहकार पॅनेलचे विजयी उमेदवारः चंदर तावरे, रंजन तावरे, राजेंद्र बारंगुले, शशिकांत कोकरे, प्रताप जगताप, सुरेश खलाटे, तानाजी पोंदकुले, रामदास आटोळे, अविनाश देवकाते.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारः बाळासाहेब कोकरे, तानाजीराव कोकरे, शिवाजी जगताप व प्रताप आटोळे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तातील औषधे १५ ठिकाणी उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डायबेटीस, हृदयरोगासारख्या महत्त्वाच्या विकारांवरील स्वस्तातील औषधे सध्या शहरात सहकारनगर, धनकवडी, कोथरूड, सिंहगड रोड, हडपसर आदी १५ ठिकाणी उपलब्ध आहेत. आठवडाभरात शंभर ठिकाणी ही औषधे उपलब्ध केली जाणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्यरेषेखालील नागरिक, तसेच दुर्बल घटकांना आजारावरील महागडी औषधे घेणे परवडत नाही. अशा घटकांसाठी 'क्वालिटी मेडिसीन अॅट अॅफोर्डेबल प्राइस'च्या (क्यू मॅप) माध्यमातून डायबेटीस, हृदयरोगावरील २३ प्रकारची औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांनी स्वस्त आहेत. राज्य औषध विक्रेता संघटनेने स्थापलेल्या कंपनीच्या आधारे ही स्वस्त औषधे बाजारात उपलब्ध करण्यात आली. या संदर्भात 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त देऊन पेशंटना दिलासा दिला होता.

'स्वस्त दरातील दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत, अशी पेशंटची मागणी होती; मात्र ब्रॅँडेड कंपन्यांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कंपनी स्थापण्यात आली. कंपनीच्या 'क्यू मॅप' योजनेद्वारे स्वस्तातील औषधे उपलब्ध करण्यात आली. शहरात धनकवडी, सहकारनगर, कोथरूड, कर्वेनगर, पौड रोड, भूगाव, हडपसर, पिंपरी यांसारख्या पंधरा ठिकाणी स्वस्तातील औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत,' अशी माहिती 'केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट'चे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली.

'ग्राहकांची सोय व्हावी म्हणून आठवडाभरात शहरातील आणखी काही ठिकाणी औषधे उपलब्ध होतील. एकूण १०० दुकानांत औषधे उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पिंपरीसह जिल्ह्यात औषधे उपलब्ध केली जातील,' असेही चंगेडिया यांनी स्पष्ट केले. औषध उपलब्ध होण्यासंदर्भात तक्रार अथवा अडचण असल्यास अधिक माहितीसाठी ९८२२०८९५८९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वस्त औषधांची ठिकाणे संपर्क क्रमांक

साई मेडिकल (धनकवडी) ८०८७९३२८३८

गणेश मेडिकल (धनकवडी) ९०४९४५४२४४

रोहित मेडिकल (हडपसर) (०२०) २६९९४०३४

वैभव मेडिकल (सिंहगड रोड) ९८५०८२८९८९

मुकुंद मेडिकल (कर्वेनगर) ९८९०९५१४०३

स्वामी मेडिकल (कोथरूड) ९९२२९९५३००

माहेश्वरी मेडिकल (सहकारनगर) ८००७२६८२८८

त्या व्यतिरिक्त गौरव मेडिकल, अविनाश मेडिकल (धनकवडी), महालक्ष्मी मेडिकल, न्यू प्रियांका मेडिकल, सिद्धिविनायक मेडिकल (कोथरूड), श्री मेडिकल (पौड रोड), श्री सेवा मेडिकल (भूगाव) आणि विघ्नहर्ता मेडिकल (पिंपरी) या ठिकाणीही स्वस्त औषधे उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images