म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गुढी पाडव्यामुळे रविवारी शेतीमालाची आवक घटली आहे. त्यामुळे कारली, डिंगरी, घेवडा आणि परराज्यातील मटारचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच लसूण, गवार, हिरव्या मिरचीचे दरदेखील दहा ते वीस टक्क्यांनी उतरले आहेत. पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत.
मार्केट यार्डातील बाजारात रविवारी दीडशे ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेशातून चार ते पाच ट्रक मटार, राजस्थानमधून चार ट्रक गाजर, कर्नाटकातून तीन ट्रक कोबी या भाज्यांची आवक झाली. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून आठ ते दहा टेम्पो हिरवी मिरची, तसेच आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून चार ते पाच टेम्पो शेवग्याची आवक झाली. कर्नाटकातून तीन ते चार टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली.
सातारी आल्याची ३५० ते ४०० पोती, टोमॅटोच्या पाच ते साडेपाच हजार पेट्या, फ्लॉवरचे १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीच्या आठ ते १० टेम्पोंची आवक झाली. सातारा, वाई, पुरंदर येथून मटारच्या २०० गोण्या, तर चिंचेच्या शंभर पोत्यांची आवक झाली. १५० ट्रक कांद्याचीही आवक झाली. इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याचे ६० ते ७० ट्रक, तसेच मध्य प्रदेशातून लसणाच्या चार हजार गोणींची आवक झाली आहे, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. गुढी पाडव्यामुळे रविवारी शेतीमालाची आवक घटली. त्याचा परिणाम फळभाज्यांच्या किमतीवर झाला. काही भाज्यांचे दर वाढले आहेत, तर काहींचे कमी झाले आहेत. बटाट्याच्या दरात दहा किलोमागे ४० रुपयांची वाढ झाली. कांद्याच्या दरात ४० रुपये, लसणाच्या दरात २०० रुपये, तर सुरती गवारीच्या दरात १०० रुपये वाढ झाली. हिरव्या मिरचीचे दर १५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. कोथिंबिरीच्या दोन लाख ५० हजार जुड्यांची, तर मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या दरात शंभर जुड्यांमागे १०० रुपयांनी घट झाली आहे. चाकवत, करडईत प्रत्येकी शंभर रुपयांची घट झाली आहे. मेथी, कांदापात, अंबाडीच्या दरात शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे.
फुलांची आवक घटली
गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांची आक घटली आहे. पाडव्याच्या सणानंतर फुलांना मागणी घटली असून, फुलांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.
द्राक्षे, डाळिंब, पेरूचे दर तेजीत
गेल्या आठवड्याच्या तुलनेत द्राक्ष वगळता इतर फळांची आवक घटली आहे. परिणामी, द्राक्षे, डाळिंब आणि पेरूचे दर वाढले आहेत. लिंबाचीही आवक घटली असल्याने गोणीमागे ४०० रुपयांची दरवाढ झाली. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात लिंबाच्या दोन ते तीन हजार गोण्यांची रविवारी आवक झाली. डाळिंबाची १५ टन, मोसंबीचे २० टेम्पो, संत्र्याचे १० टेम्पो, तर पपईच्या १० ते १५ टेम्पोंची आवक झाली. चिकूच्या ५०० गोण्या, पेरूच्या ५० क्रेटची आवक झाली. आंब्याच्या ४०० ते ५०० पेट्या, तसेच कलिंगडाचे साठ ते सत्तर टेम्पो, खरबुजाचे २० ते २५ टेम्पो एवढी आवक झाली आहे. द्राक्षाची २५ ते ३० टन, स्ट्रॉबेरीची दोन टन, तर रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक हजार ते बाराशे पेट्यांची आवक झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाची आवक घटली असल्याने दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. द्राक्षाची आवक स्थिर असून, मागणी जास्त झाल्याने एक टक्क्याने दरवाढ झाली आहे. स्ट्रॉबेरीमध्येही २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, दिवसेंदिवस लिंबाला मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बाजारात लिंबाची आवक घटली असल्याने दरामध्ये गोणीमागे चारशे रुपयांची दरवाढ झाली.
मागणीअभावी मासळीचे दर स्थिर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीला मागणी घटली आहे. त्यातच आवकही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या सर्व मासळीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. गणेश पेठ येथील मासळीच्या बाजारात खोल समुद्रातील मासळीची साडेसहा टन, खाडीच्या मासळीची शंभर ते दीडशे किलो, नदीच्या मासळीची दोनशे ते तीनशे किलो एवढी आवक रविवारी झाली. आंध्र प्रदेशातून दहा टन आवक झाली आहे. गुजरात आणि रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणावर मासळीची आवक सुरू आहे. आंध्रातील समुद्रातील मासळीची आवक कमी होऊ लागली असल्याने आगामी काळात आवक घटणार आहे. त्यामुळे मासळीचे दर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज परदेशी यांनी व्यक्त केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट