'रंगमंचावर काम करताना कलावंत म्हणून अनेकविध अनुभव येत असतात. मात्र, कलावंतांना आपले अनुभव शब्दबद्ध करण्याचा, लिहिण्याचा कंटाळाच अधिक आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी खंत व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे लिखित 'नटरंगी रंगलो' या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. संवाद आणि मैत्रेय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले. त्या वेळी व्यासपीठावर मोघे, त्यांच्या पत्नी शोभना मोघे, साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, आत्मचरित्राचे शब्दांकन केलेले वैभव वझे, प्रकाशिका जयश्री देसाई, 'संवाद'चे सुनील महाजन उपस्थित होते.
'पन्नाशीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या नाटकांचे, नाटक चळवळीचे श्रीकांत मोघे साक्षीदार आहेत. कलावंत हा इतिहासाचा प्रामाणिक, पारदर्शक असा प्रवक्ता असतो. कलावंतांना लिहिण्याचा अधिक कंटाळा आहे. पूर्वीच्या काळातील नाटकांचे उतारे, संवाद प्रेक्षकांच्या तोंडपाठ असायचे. आता मात्र खूप कमी उदाहरणे पाहायला मिळतात. मोघे यांचे पुस्तक एका काळाचा दस्तऐवज आहे. रंगभूमीवरील नव्या पिढीसाठी हे पुस्तक संदर्भ म्हणून फायदेशीर ठरेल,' असे गौरवोद् गार डॉ. जब्बार पटेल यांनी काढले. सच्चेपण असलेली, देशासह समाज, जाती पातीची जाण असलेली व्यक्ती म्हणजे खरा नट होय. याशिवाय त्याच्याकडे चांगली देहबोली असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मोघे यांची वझे, देसाई यांनी मुलाखत घेतली. 'कोकणातील किर्लोस्करवाडीचा मी 'प्रॉडक्ट' आहे. मात्र, आता किर्लोस्करवाडीशी आपला पूर्वीसारखा संबंध राहिला नाही', असे सांगताना मोघे यांनी मुलाखतीत विविध आठवणींना उजाळा दिला. विनिता पिंपळखरे यांनी सूत्रसंचालन, तर महाजन यांनी प्रास्ताविक केले; तसेच निकिता मोघे यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट